Thursday, February 26, 2026

BMC Budget 2026 : मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - महापौर रितू तावडे

BMC Budget 2026 : मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - महापौर रितू तावडे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वित्तीय वर्ष २०२६-२०२७ करिता सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाज हे मुंबईच्या रूपातील देशाच्या ग्रोथ इंजिनला गती देणारे आहे. रस्ते, पदपथ, पूल, पाणी, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांपासून पायाभूत सुविधा प्रकल्पांपर्यंत, सामाजिक घटकांचे कल्याणापासून पर्यावरण संवर्धनापर्यंत आणि अद्ययावत तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अवलंब करण्यापर्यंत सर्वसमावेशक बाबी यामध्ये आहेत. अधिकाधिक सूचनांचा समावेश करून महानगरपालिका प्रशासनाने मुंबईच्या शाश्वत विकासाची ग्वाही देणारा असा हा अर्थसंकल्प सादर केला आहे, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२६ - २०२७ चे 'अ', 'ब' आणि 'ग' हे अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती सभेमध्ये, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना आज (दिनांक २५ फेब्रुवारी २०२६) सादर केले. तर, शिक्षण खात्याचे 'ई' अर्थसंकल्पीय अंदाज शिक्षण समिती सभेमध्ये, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांचेकडे सादर केले.

काय म्हणाल्या रितू तावडे ?

याअनुषंगाने अर्थसंकल्प अंदाजाविषयी प्रतिक्रिया देताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगराच्या शाश्वत विकासासाठी तसेच या महानगरामध्ये जागतिक दर्जाचा विकास घडवण्यासाठी पर्यायाने आर्थिक राजधानीला बळकटी देण्यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्याजोडीला आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुपाने तिसरे इंजिन जोडले गेले आहे. या ट्रिपल इंजिनाच्या गतीसमवेत धावता येईल, इतका बळ देणारा अर्थसंकल्प बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सादर केला आहे. वित्तीय भान, पायाभूत सुविधांची आश्वासक पूर्तता, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण यासारख्या थेट जनहिताशी जोडलेल्या घटकांमध्ये भरीव तरतूद, पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी भविष्यवेधी प्रयत्न, प्रशासकीय कार्यक्षमता, आपत्कालिन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुसज्जता तसेच व्यवसाय सुलभता व सामाजिक उपक्रम या सात वचनांच्या आधारे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा मुंबईकरांप्रती वचनबद्धता अधोरेखित करणारा आहे, असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्रं प्रदान करणे, किमान वर्षभर संपूर्ण मुंबई महानगरात सुरु राहील असा 'मुंबई स्वच्छता संकल्प ३६५’ अभियान हाती घेणे, मुंबई महानगराच्या वैभवाला व ओळखीला साजेसे असे मुंबईच्या चारही प्रमुख प्रवेश मार्गांवर भव्य प्रवेशद्वार व घड्याळ मनोरा (क्लॉक टॉवर) उभारणे यासह मी स्वतः सूचित केलेल्या विविध बाबींचा मुख्य अर्थसंकल्पात प्रशासनाने समावेश केला, याचेही समाधान आहे, असेही महापौरांनी नमूद केले आहे.

त्याचप्रमाणे, शिक्षण खात्याच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा देखील विद्यार्थीभिमुख आहे. नवीन शैक्षणिक उपक्रमांसह हाती घेण्यात येणारे मिशन सफल, शालेय इमारतींची बांधणी व दुरुस्ती तसेच दर्जोन्नती, अत्याधुनिक बैठक व्यवस्था, ४० शाळांमध्ये खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन करणे, प्रायोगिक तत्त्वावर विज्ञान पार्कची उभारणी, डिजीटल क्लासरुम करणे, विज्ञान प्रयोगशाळांचे तसेच ग्रंथालयांचे अद्ययावतीकरण, जादुई पिटारा उपक्रम, शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना सायबर साक्षरता प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बसमध्ये विनामूल्य प्रवास अशा वैविध्यपूर्ण योजना / उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडण्यास हातभार लागेल, असेही महापौर रितू तावडे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >