मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी अर्थात २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करतात. महाराष्ट्र या राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली आणि मराठी भाषिकांचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ मे १९६५ पासून दरवर्षी महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे रोजी मराठी राजभाषा दिन अर्थात मराठी भाषा दिन किंवा 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात.
'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्याबाबतचा निर्णय १९६५ मध्ये तत्कालीन वसंतराव नाईक सरकारने घेतला होता. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असेल असेही वसंतराव नाईक सरकारने जाहीर केले. 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' हा ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध झाला. हाच अधिनियम पुढे कायदा म्हणून १९६६ पासून अंमलात आला.
मातृभाषेचा गौरव दिन
कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. याच कारणामुळे त्यांच्या सन्मानार्थ २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करतात.







