मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडण्यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी नियोजन सुरू आहे. सुरक्षेचे आवश्यक ते उपाय करून, पुरेशी खबरदारी घेऊन रविवार १ मार्च २०२६ पासून मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू करत आहोत, अशी घोषणा राज्याचे मत्स व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली. लवकरच मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड अशा विविध मार्गांवर जलवाहतूक सुरू करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबई ते विजयदुर्ग या रो रो सेवेच दर आणि वेळापत्रक या संदर्भातली माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकिटांचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शिमोगोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रो रो हा एक सुरक्षित आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे. नागरिक याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत आणि यापुढेही उत्साहवर्धक प्रतिसाद असेल असे दिसत आहे. रो रो सेवेच्या माध्यमातून मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम होणार आहे.
रो रो सेवेमुळे मुंबई ते कोकण प्रवास वेगाने करता येईल. वेळेची बचत होण्यास मदत होईल. आंबा, काजू, मासेमारी व्यवसायाला चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल. पर्यावरणपूरक विकास हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून रो रो सेवेचे नियोजन सुरू असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.