मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुधवारी विधान परिषदेत याबाबत निवेदन सादर केले. या निर्णयानुसार महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात येणार आहे.
महागाई भात्यातील ही वाढ जुलै २०२५ पासून लागू करण्यात येणार असून, जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च २०२६ मध्ये अदा करण्यात येईल. तसेच नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. या निर्णयाचा लाभ सुमारे ५.९६ लाख शासकीय कर्मचारी, तसेच ८.१२ लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.







