एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण
संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता आणि बेल्टने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ममता रोहित वाळके (वय २९, रा. श्रीरामनगर) यांचे पती रोहित वाळके हे २२ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० च्या सुमारास इंदिरानगर येथील म्हसोबा मंदिर जवळील मैदानावर 'टुर्ला' मॅच खेळण्यासाठी गेले होते. यावेळी हल्लेखोरांनी जुन्या वादाचा राग मनात धरून रोहित यांच्यावर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचत असताना, रोहित यांचा मित्र उत्तम काकड याला आरोपींनी ओढल्यामुळे रोहित यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले होते. याच कारणावरून या पाच जणांनी त्यांच्याशी वाद उकरून काढला.त्यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने रोहित यांच्यावर हल्ला चढवला. अथर्व रासने, ओम काथे, साहिल देवरे, सुमित शेवंते व शनैश रोकडे (सर्व रा. संगमनेर) यांनी रोहित यांच्या मानेवर कोयत्याने वार केला, खांद्यावर कोयता मारून गंभीर दुखापत केली, तसेच बेल्टने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर जखमी रोहित यांना तातडीने संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ममता रोहित वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये अथर्व रासने याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक पगारे यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत. शहरात अशा प्रकारे शस्त्राने हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.







