मुंबई : "युवा पिढीसमोर अंमली पदार्थांचे मोठे आव्हान आहे. या प्रश्नाबाबत राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यातील आरोपींना मकोका कायदा लावण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यातच गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद असून, त्यानुसार कारवाई करण्यात येईल", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी केलेली कारवाई आणि अंमली पदार्थांचा जप्त केलेला साठा यासंदर्भात अमिन पटेल, वरूण सरदेसाई, अस्लम शेख आदी आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की अंमली पदार्थांच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास थेट बडतर्फीच्या कारवाईचा निर्णय करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५ पोलिस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून दहाजणांना निलंबित करण्यात आले आहे.
कुरिअर कंपनीवरही नजर
अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. इन्स्टाग्रामसारख्या अॅपचा 'मार्केट प्लेस' म्हणून वापर केला जात आहे. तसेच कुरिअर कंपन्यांचाही वापर केला जातो. कुरिअरद्वारे अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचे आढळून आले आहे. अशा कुरिअरवर कारवाई केली जात आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मोठ्या रकमेचा साठा जप्त करण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. कारण, अगदी छोट्या ठिकाणी कोणताही कारखाना वगैरे नसले तरी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी जी सामग्री किंवा रसायने लागतात त्या परवानाधारक पुरवठादारांवरही नजर ठेवली जात आहे. अंमली पदार्थांच्या प्रत्येक घटनेत पुढची आणि मागची साखळी उघड करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर परराज्यातून गुन्हेगार ताब्यात घेतले. एका प्रकरणात तर परदेशातून गुन्हेगाराला पकडून आणले. अशा प्रकरणात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.