बीड : बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी,गारा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन काढणीच्या टप्प्यावर आलेली गहू, हरभरा यासह अन्य रब्बी पिके भिजली. अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून त्याचा थेट परिणाम शेतशिवारातील बहरलेल्या रब्बी पिकांवर दिसून येत आहे. गहू, ज्वारी, कांदा आणि हरभरा या पिकांवर किडी, अळी व विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. काही ठिकाणी आंब्याच्या बागांनाही फटका बसला असून मोहोर गळून पडला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पूस परिसरासह काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड शहर व परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे काढणीला आलेला गहू व हरभरा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आहे. मागील पाच वर्षांपासून फेब्रुवारी अखेर व मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीच्या घटना घडताना दिसत असून, याच काळात काढणीस आलेली पिके मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. यंदा माजलगाव धरण भरलेले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात रब्बी हंगामाची पेरणी केली होती.
हरभरा गहू समवेत ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करत मदत जाहीर करावी अशी मागणी पुढे आली आहे
मशागतीसाठी खर्च करून जोपासलेली पिके अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हतबल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करत आहेत.







