मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आमदार विक्रम काळे यांनी "शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे काम दिले जातेय," असा खळबळजनक आरोप केल्यानंतर, राज्यमंत्री पंकज भोयार यांनी वस्तुस्थिती मांडत या आरोपांमधील हवा काढून घेतली. "अनुभवी सदस्य असलेल्या विक्रम काळे यांनी 'राईचा पहाड' करू नये," अशा शब्दांत भोयार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
कुत्रे मोजण्याचे काम नाही, तर विद्यार्थ्यांची सुरक्षा!
विक्रम काळे यांच्या आरोपाला उत्तर देताना पंकज भोयार यांनी स्पष्ट केले की, शासनाने कोणत्याही शिक्षकाला कुत्रे मोजण्याचे काम दिलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घडणाऱ्या विपरीत घटना लक्षात घेता, माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छतेबाबत काही आदेश दिले आहेत. शाळांच्या परिसरात खाद्यपदार्थ पडलेले नसावेत आणि शाळेला व्यवस्थित कुंपण असावे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही; ही खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाला आहेत. "हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काम आहे, कुत्रे मोजण्याचे नाही," असे स्पष्टीकरण भोयार यांनी दिले.
शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याचे मान्य करत पंकज भोयार म्हणाले की, "शिक्षण हक्क कायदा (RTE) २००९ नुसार जनगणना, आपत्ती निवारण आणि निवडणुकांची कामे करणे शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. तरीही, २८ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार आम्ही शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण केले आहे. इतर विभागांची कामे शिक्षकांना सांगू नयेत, अशा स्पष्ट सूचना आम्ही सर्व विभागांना दिल्या आहेत." शिक्षकांना केवळ शिकवण्यावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी सरकार काही नव्या पर्यायांवर विचार करत असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.
यामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या पर्यायांचा समावेश आहे, आठवड्यातील एक शनिवार केवळ प्रशासकीय किंवा अशैक्षणिक कामांसाठी द्यावा का? जेणेकरून उर्वरित पाच दिवस शिक्षक पूर्णपणे शिकवण्याचे काम करतील. गावागावातील 'सेतू' किंवा 'सुविधा केंद्रां'मार्फत ही तांत्रिक कामे करता येतील का, याचाही विचार सुरू आहे. या संदर्भात येणाऱ्या आर्थिक भाराचे गणित मांडून आणि शिक्षक लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पंकज भोयार यांनी दिले. मंत्र्यांच्या या अभ्यासपूर्ण उत्तरामुळे शिक्षकांच्या कामाच्या स्वरूपावरून निर्माण झालेला गोंधळ दूर होण्यास मदत झाली आहे.







