- दोषींना तुरुंगात पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - रोहित पवार
- मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अदिती तटकरेंच्या डोळ्यात तरळले पाणी
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी पक्षभेद विसरून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, आमदार जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेकांचा अनेकांचा कंठ दाटून आला. तर, त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी दादांच्या अपघाताला कारणीभूत असलेल्या दोषींना तुरुंगात धाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला.
शोकप्रस्तावावर बोलताना आमदार रोहित पवार भावूक झाले. ते म्हणाले. "दादा नेहमी मला शर्टाचे वरचे बटण लावण्यास सांगायचे. पण आता हे बटण असेच उघडे राहील. ४०-५० वर्षांनी जेव्हा वर दादांची भेट होईल, तेव्हा त्यांच्यासमोरच मी हे बटण लावेन. तोपर्यंत हे उघडे बटण मला रोज त्यांची आठवण करून देत राहील. दादांना आदरांजली म्हणून मी माझे केस कापले आहेत. राजकीय वजन वाढवण्याचा शब्द मी त्यांना दिला आहे. पण त्यांच्या अपघाताला जो कोणी दोषी असेल, तो कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही," असेही त्यांनी सांगितले.
आधारवड उन्मळून पडला - छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांना तर 'श्रद्धांजली' हा शब्द उच्चारणेही कठीण झाले होते. "अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलण्याची वेळ येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. ते मंत्रालयात कुठेतरी काम करत असतील असेच अजूनही वाटते. दादा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या गुणांचा मिलाफ होते. एक मोठा आधारवड उन्मळून पडला की त्याच्या फांद्या किती विस्तारलेल्या होत्या हे समजते, तशीच अवस्था आज आमची झाली आहे," असे म्हणताना भुजबळांचा कंठ दाटून आला.
मुश्रीफ आणि आदिती तटकरे यांना अश्रू अनावर
- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "१९९९ साली मी निवडून आलो आणि दोन महिन्यांत त्यांनी मला मंत्री केले. नऊ वेळा मी मंत्री म्हणून शपथ घेतली. माझी शपथ झाली, की मुश्रीफ साहेब तुमची शपथ होणारच असे अजित पवार म्हणायचे. यावेळी ते मला सोडून गेले. अजितदादांना कुणाची तरी दृष्ट लागली". २६ जानेवारीच्या एका प्रसंगाची आठवण सांगताना ते म्हणाले, "दादा मिश्किलपणे विचारायचे, डोक्यावर केस नसले तरी मी देखणा दिसतो ना? आज तो माणूस आम्हाला सोडून गेला यावर विश्वास बसत नाही."
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनाही भाषण करताना रडू कोसळले. "आज सभागृहात त्यांची खुर्ची रिकामी पाहून आमचा भ्रम तुटला. दादा आमचा माज होते, आमचा रुबाब होते. आज नेता गेलाच, पण त्यासोबत आमचा रुबाबही गेला," अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.
अजितदादांशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही - जयंत पाटील
अजित पवारांचे जुने सहकारी जयंत पाटील यांनीही भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “कोणाची नजर लागली माहिती नाही. महाराष्ट्रात ज्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघितले जाते, त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का? विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि अजितदादा निघून गेले. दोन दशके दादा महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती होते. त्यामुळे जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अनेक दिग्गजांची नावे येतील. पण, अजितदादांचे नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही”.


