मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष सखोल फेरनिरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम जाहीर केला असून, या प्रक्रियेचा राज्यभर प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी भाजपने विशेष नियोजन केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात पक्षाची विशेष 'एसआयआर' समिती गठीत केली असून, यात अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, दुबार नावे वगळणे आणि पात्र मतदारांची नोंदणी सुनिश्चित करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता व्हावी, यासाठी भाजपच्या या समितीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या या महत्त्वाच्या समितीत माजी खासदार किरीट सोमय्या, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, आमदार रणधीर सावरकर, आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, माजी आमदार सुनील राणे आणि माजी जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा समावेश आहे.







