मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुती सरकार अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूबाबत असलेले सर्व संशय दूर करू इच्छिते.
रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला भाजपची सहयोगी पक्ष एनसीपीकडून विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी असलेले पत्र प्राप्त झाले होते आणि याबाबत मी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे.” ते पुढे म्हणाले, “डीजीसीए (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) आणि राज्याच्या सीआयडी पथकाच्या चौकशीबरोबरच सीबीआय चौकशी करण्याचीही विनंती करण्यात आली आहे.”
फडणवीस यांनी सांगितले की, डीजीसीए कडून व्हीसीआर कंपनीचे लेखापरीक्षण (ऑडिट) सुरू असून कंपनीच्या सर्व लॉगबुकची तपासणी केली जात आहे. “आपल्याला चौकशी अहवालाची प्रतीक्षा करावी लागेल आणि तर्क-वितर्क टाळावेत,” असे त्यांनी नमूद केले.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “काही शंका असू शकतात; त्या योग्य प्राधिकरणाकडे पाठवण्यात येतील. आम्ही चौकशीचा नियमित पाठपुरावा देखील करू. डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असे मला वाटते.”
फडणवीस यांनी हेही सांगितले की त्यांनीही अनेकदा व्हीसीआर विमानाने प्रवास केला आहे. दरम्यान, २८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळ विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली.