बुलढाणा : बुलढाणा मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा मधील चिखला काकड गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सरपंचासह २३ जणांना अटक :
महाराजांच्या पुतळ्याचा वाद हा गेल्या चार दिवसांपासून सुरू असून आता गावात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कारवाईही केली आहे. पोलिसांकडून गावच्या सरपंचासह २३ जणांना अटक करण्यात आली आहे.
नेमका वाद काय ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस आधी गावातील एका मोकळ्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. मात्र, ही जागा गावातील विविध सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी विशेषतः लग्नसमारंभासाठी वापरली जात असल्याने, हा पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केली होती. याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आले होते. तरीही पुतळा हलवण्यात न आल्याने वाद चिघळला.
नंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे. गावातील महिलांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. या घटनेत उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.