मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजूपासून म्हणजेच सोमवार २३ फेब्रुवारी पासून सुरु झाले आहे. आज सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पीय सादर करतील.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भावनाचे वातावरण भावूक होण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे. पारंपरिक पद्धतीनुसार हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जाईल आणि त्यांच्याच हस्ते वाचून दाखवला जाईल. मात्र, यावेळी अनेक सदस्यांनी अजित पवार यांच्या कार्याबाबत सभागृहात मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याने शोकप्रस्तावावर विशेष चर्चा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे गटनेते तसेच प्रत्येक पक्षातील किमान तीन सदस्य हे सभागृहात आपली भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.







