कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक लोकांकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी होताना दिसते, आणि त्यावर कायमचा तोडगा महापालिका शोधताना दिसतही आहे. पण ही संख्या दिवसेंदिवस इतकी वाढत जाते आहे की याला आता आवरण मुश्किल झालय. या भटक्या कुत्रांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी होतात तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. ही दहशत इतकी वाढली आहे की लोकांच्या मनात याची भीती बसली आहे. आणि याच भीतीपोटी एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.
कल्याण पूर्वेतील सहजीवन सोसायटीमधील एक आयाश आमीन या तरुणाच्या पायाला काही दिवसांपूर्वीच भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर त्याने रेबीजचे इंजेक्शनही घेतले होते. परंतु याच कुत्र्याच्या चाव्याच्या भीतीने तो चिंतेत होता. घरातला कमावता मुलगा असल्याने मला रेबीज झाला तर घरच्यांचं कस होणार ही भीती त्याला सतावत होती. या भीतीमध्येच रेबीजची लक्षणे आपल्यात दिसू लागली आहेत असा भास त्याला व्हायचा.
यामुळे खचून त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने त्याच्या भीतीची कारणे लिहिली होती. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनी केडीएमसी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली आहे. भटक्या कुत्र्यासंदर्भात त्वरित उपाययोजना करण्यात यावी ही मागणी त्यांनी केली आहे. मात्र या तरूणाच्या टोकाच्या पावलामुळे सर्वांनाच हादरा बसला आहे







