क्राइम : अॅड. रिया करंजकर
प्राचीन काळामध्ये बालविवाह हा विवाहाचा प्रकार चालत होता. मुलं सज्ञान होण्याच्या आतच त्यांचं पाळण्यातही लग्न लावून दिलं जात होतं. त्यामुळेही लग्न त्या त्या जाती-धर्मामध्ये होत होती. आधुनिकीकरणामुळे जगाची ओळख इतर जगात होऊ लागली आणि विवाह व्यवस्थेमध्येही कालांतराने बदल होत गेले. मुलीचे वय १८ व मुलाचे २१ असे करण्यात आले. आता त्याच्यातही बदल करण्यात आलेला आहे. मुलीचे वय २१ करण्यात आलेले आहे आणि आताची मुलं ही सुशिक्षित स्वतःच्या स्व-रकमेवर जगणारी आहेत. त्याच्यामुळे स्वतःचे निर्णय आणि स्वतःचा जोडीदार ही मुलं निवडू लागलेली आहेत. त्याचे बरे-वाईट परिणाम मुलांच्या आयुष्यावर होऊ लागले आहेत.
राधा ही मध्यमवर्गीय मुलगी होती आणि मागासवर्गीयात तिचा जन्म झालेला होता. तिने आपलं उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका चांगल्या ठिकाणी ती नोकरी करत होती. आई-वडिलांनी तिला चांगले संस्कार दिलेले होते. त्याच कंपनीमध्ये समर नावाचा मुलगा काम करत होता. त्या समरला राधा आवडत होती. तो तिला अनेक प्रकारे लग्नासाठी मागणी घालण्याचा प्रयत्न करत होता. पण ती त्याला दाद देत नव्हती. कारण समर हा उच्चश्रेणी कुटुंबात जन्मलेला मुलगा होता आणि त्यांच्या जाती-धर्मामध्ये खूप तफावत होती आणि समरच्या घरातील लोक तिला स्वीकारणार नाहीत हे तिला पूर्वीपासून माहीत होतं. त्यामुळे ती त्याचा प्रस्ताव टाळत होती. शेवटी समरने मैत्रिणीच्या मध्यस्थीने राधाला होकार देण्यास भाग पाडले. समरने राधाला सांगितलं की, माझ्या जाती-धर्मामध्ये लग्न न करता, धर्मामध्ये लग्न करतो. त्यासाठी मी तुझा धर्म स्वीकारतो. राधानेही ते मान्य केलं व राधाच्या धर्मानुसार त्यांचे लग्न झालं. सुरुवातीचा काळ त्यांच्यात व्यवस्थित गेला. समरचे नातेवाईक, आई-वडील हे राधाकडे येऊ लागले आणि समर हा गावाकडून शहरामध्ये स्थायिक झालेला होता. त्यामुळे समर आणि राधाच्या संसाराला राधाच्या आई-वडिलांनी हातभार लावलेला होता व त्यांचा संसार उभा केला होता. दीड वर्षं झाल्यानंतर समर हा नोकरी सोडून अचानक गावाकडे निघून गेला आणि त्याने पोलिसात तक्रार केली, की राधाने माझ्यावर जबरदस्ती करून, माझे धर्मपरिवर्तन करून माझ्यावर जबरदस्तीने आपल्या धर्मात लग्न करून घेतलं. त्यामुळे हे लग्न मला मान्य नाही. कारण समरच्या आई-वडिलांनी गावाकडे एका चांगल्या कुटुंबातील मुलगी त्याच्यासाठी बघितली होती आणि या खालच्या जातीतल्या मुलीला आता सोडून दे आणि आपल्या धर्मातील मुलगी कर असा त्याच्यावर दबाव आणत होते आणि त्यासाठी त्यांनी त्याला नोकरी सोडून गावी बोलवलं होतं आणि राधाला तिच्या धर्मामध्ये लग्न करण्याची कळ ही समरनेच घातलेली होती.
समरने तिच्यावर माझे धर्मपरिवर्तन करायला लावले हा आरोप केला. त्यामुळे राधाला मोठा धक्का बसला होता. कारण ती हा प्रस्ताव प्रथम स्वीकारत नव्हती, पण मैत्रिणीच्या मध्यस्थीने तिने हा प्रस्ताव स्वीकारला होता आणि एका मुलावर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी लग्न केलं होतं, पण ज्यावेळी समर तुझ्या धर्मात आपण लग्न करू या आणि त्यासाठी मी धर्म परिवर्तन करतो, त्यावेळी नक्कीच पुढे काहीतरी गडबड असेल हे तिच्या जराही लक्षात आलं नाही आणि आज ती पोलीस स्टेशनला चकरा मारत आहे. तिनेही समरच्या विरुद्ध पोलीस तक्रार केली होती आणि हे प्रकरण आता न्यायालयात गेलेलं होतं.
ज्याच्याशी आपण लग्न केलं आहे, तो आपल्याला धर्मांतर या विषयावर फसवू शकतो, ही जराही तिला कल्पना आली नव्हती. राधा ही समरवर विश्वास ठेवून फसली होती. लग्नाला होकार देऊन तिचं आयुष्य आता नरकासमान झालं होतं.
(सत्यघटनेवर आधारित)