Sunday, February 22, 2026

Mumbai-Pune Expressway : ३२ तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मिळणार रिफंड; जाणून घ्या रिफंड कसा मिळवाल ?

Mumbai-Pune Expressway : ३२ तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मिळणार रिफंड; जाणून घ्या रिफंड कसा मिळवाल ?

मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधल्या वाहतुकीचा वेग वाढावा म्हणून नव्वदच्या दशकात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बांधण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी या एक्स्प्रेस वेच्या वेगाला एका अपघातानं ब्रेक लागला होता. अखेर ३२ तासांनंतर मध्यरात्री २ वाजता पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली होती. अनेकांना या वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागलं होतं. या वाहतूक कोंडीत हजारो प्रवासी अडकून पडले होते आणि अनेकांना पाणी, अन्न तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागला.मात्र आता त्या सर्व प्रवाशांना आता दिलासा मिळाला आहे.

तब्बल १.२ लाख प्रवाशांना सुमारे ५.१६ कोटींचा टोल परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा परतावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत देण्यात येणार असून, येत्या काही दिवसांत संबंधित वाहनचालकांच्या FASTag खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे.

अपघातानंतर प्रशासनाने तातडीने टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र तोपर्यंत काही वाहनधारकांच्या FASTag खात्यांतून टोलची रक्कम वजा झाली होती. याच व्यवहारांची माहिती तपासून आता ती रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. MSRDC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश दिल्यानंतरही ज्या वाहनधारकांकडून टोल वसूल झाला आहे, त्या सर्वांना पूर्ण परतावा दिला जाणार आहे.

परताव्यात मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर तसेच पुणे–बंगळुरू महामार्ग या मार्गांवरील टोलचा समावेश असणार आहे. टोल वसुली करणाऱ्या IRB Infrastructure Developers या कंत्राटदार कंपनीकडून FASTag व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल नाक्यांवरील बॅरिअर्स पूर्णपणे उघडण्यापूर्वी काही व्यवहार आपोआप प्रक्रिया झाले असण्याची शक्यता आहे. अशा सर्व व्यवहारांचा डेटा तपासून संबंधित प्रवाशांना पैसे परत दिले जाणार आहेत.

'३२ तासांची' कोंडी या घटनेनंतर टोल परताव्याची मागणी जोर धरत होती. आता जवळपास १.२ लाख प्रवाशांना ५ कोटींहून अधिक रक्कम परत मिळणार असल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment