धाराशिव : लग्नसमारंभाला अवघे काही दिवस बाकी असताना दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. धाराशिव जिल्ह्यातील रत्नापूर पाटी परिसरात पहाटे घडलेल्या भीषण अपघातात नुकतेच साखरपुडा झालेले जोडपे जागीच मृत्युमुखी पडले. या घटनेने वाशी तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर पाटीजवळ आज पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. Tata Nexon या चारचाकीने तीव्र वळण घेताना नियंत्रण गमावले आणि समोरील टोल कमानीवर जोरात आदळली.
या अपघातात वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय रामभाऊ शिनगारे (२५) आणि वाशी येथील अक्षया सुनील चव्हाण (२३) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघांचा चार दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला होता. लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेली असतानाच घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षया चव्हाण हिच्या महापारेषण परीक्षेसाठी दोघे लातूरकडे निघाले होते. रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट कमानीवर जाऊन धडकली. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाच्या पुढील भागाचा चुराडा झाला.
वाहतूक काही काळ ठप्प
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. लग्नाच्या उत्साहात असलेल्या दोन कुटुंबांवर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.