मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा बारावी-दहावी परीक्षा राज्यात सुरू झाल्या आहेत. या परीक्षेच्या कार्यकाळात मुलं अभ्यासाच्या तणावातून जात असतात. तेव्हा पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावयास हवे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून राज्यात सुरू झाली आहे. या परीक्षा पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, कोल्हापूर व कोकण अशा ९ विभागीय मंडळांच्या मदतीने घेत असतात. बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत १०९ गैरप्रकार झाले असून कोकण विभागीय मंडळामध्ये एकही गैरप्रकार झालेला नाही. तेव्हा परीक्षा मंडळाने अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. दोन्ही परीक्षा मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. पालकांनी मुलांच्या तणावाच्या लक्षणाकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. म्हणजे त्यांना परीक्षाकाळात तणावमुक्त परीक्षा देता येईल. त्यासाठी पालकांनी परीक्षेच्या कार्यकाळात परीक्षा सुरू असताना मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
परीक्षेचे वेळापत्रक जसजसे जवळ येते तसतसे मुलांचा ताण वाढण्याला मदत होत असते. जी मुले नियमित अभ्यास करतात त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत नाही. तेव्हा आई-वडिलांनी मुलांची केवळ परीक्षेपुरती काळजी न घेता नियमितपणे काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा परीक्षा जवळ आली की मुलांची डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी, झोप न येणे, मूल चिडचिडे होणे असे दिसून येते. अशा वेळी पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन सकारात्मक दृष्टिकोन मुलांबरोबर ठेवावा. याचा परिणाम म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळून ती अधिक जोमाने अभ्यास करून तणावमुक्त होऊन परीक्षेला आनंदाने सामोरे जातील. पालकांनी आपली मुले परीक्षेत यशवंत होण्यासाठी परीक्षेच्या कालावधीत मुलांच्या मनात तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी. तेव्हा मुलांच्या अभ्यासातील प्रगतीचा भूतकाळ कसा होता किंवा त्यांनी काय केले याची उजळणी न करता त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्याशी सुसंवाद साधावा. मुलांच्या परीक्षेविषयी त्यांच्या मनातील भीती दूर करावी. त्यांना आनंदित ठेवावे. पालकांनी अभ्यासासाठी जास्त सक्ती करू नये. मुलांनासुद्धा आपल्या परीने अभ्यास करू द्यावा. तेव्हा आपल्यावरती आता धाक नाही असे मुलांनी न समजता अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. यात आपलेच नुकसान होणार आहे, याची मुलांनी दक्षता घ्यावी. यासाठी मुलांनी आज्ञाधारक राहिले पाहिजे.
महत्त्वाची बाब म्हणजे, आपले मूल परीक्षेच्या काळात पुरेसे जेवण करीत आहे का? याकडे सुद्धा पालकांनी लक्ष द्यायला हवे. मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी त्यांचे आरोग्य चांगले असावे लागते. त्यासाठी त्यांना संतुलित आहार नियमित मिळणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांची ऊर्जा टिकून राहते. परीक्षा काळात मुलांच्या जेवणात बदल करू नये. तसेच त्यांना पुरेशी झोप घेण्यास सहकार्य करावे. मुलांना पुरेशी झोप मिळाल्यामुळे ते अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. त्यात टीव्ही पाहणे आणि आरोग्यासाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा असतो. काही पालक रात्रभर अभ्यास करा असे मुलांना सांगत असतात किंवा अभ्यासिकेत पाठविले जाते. अशा वेळी पालकांनी सुद्धा मुलांचा कल लक्षात घेणे गरजेचे असते. कारण इतरांपेक्षा आपल्या मुलांच्या आवडीनिवडी पालकांना जास्त माहिती असतात. अभ्यासाबरोबर आरामाचीसुद्धा मुलांना नितांत आवश्यकता असते. याकडे सुद्धा पालकांनी अधिक लक्ष द्यायला हवे. याचा जास्त फायदा आपल्या मुलांना होत असतो. याची कल्पना पालकांना असायला हवी. अभ्यासाबरोबर घराचीसुद्धा स्वच्छता जास्त महत्त्वाची असते. त्याचबरोबर पालकांनी स्वत: शांत राहणे महत्त्वाचे असते. परीक्षा काय दररोज होत नाहीत. मात्र परीक्षेचा काळ मुलांप्रमाणे पालकांसाठीही महत्त्वाचा असतो. या कार्यकाळात मुलांना तणावमुक्त होण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे असते, मात्र यात जास्त वेळ घालवू नये. मुलांच्या अभ्यासासाठी कशी मदत होईल त्या दृष्टीने प्रयत्न करावा. यात जास्त वेळ घालवू नये. परीक्षेच्या काळात मुलांचा ताण वाढल्यास मुलांनी त्याचा सामना कसा करावा याचा योग्य सल्ला घ्यावा. या काळात मुलांना अभ्यास करताना व्यत्यय येणार नाही याची पालकांनी काळजी घ्यावी. आरामात अभ्यास करेल अशा जागेत त्याला अभ्यास करण्यासाठी बसवावे. परीक्षा सुरू असल्याने आपल्या मुलांना प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहित करावे. विद्यार्थी आणि परीक्षा यांचा कसा सबंध असतो. परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर आपले ध्येय सहज पार करू शकतो याची आठवण मुलांना करून द्यावी. काही वेळा परीक्षा काळात मुलांना चिंताग्रस्त होणे साहजिकच आहे. मात्र सकारात्मक दृष्टिकोन मुलांनी ठेवायला पाहिजे. ही नैसर्गिक प्रतिक्रिया असून त्यावर सहज मात करता आली पाहिजे. यासाठी वर्षभरात झालेला अभ्यास दरदिवशी करणे आवश्यक आहे. अभ्यास झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता अधूनमधून अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून अभ्यास करावा. म्हणजे त्या अभ्यासक्रमाची उजळणी होऊन मुलांच्या मनात तणाव निर्माण होत नाही. यात अभ्यासात चुकारपणा मुलांनी करू नये. अभ्यासासाठी मुलांवर दबाव वाढवू नये तर मुलांच्या समस्या सुद्धा पालकांनी समजून घेणे गरजेचे असते. परीक्षा झाल्यावर पेपरमध्ये कठीण प्रश्न कोणते होते? किती लिहिलाय? पेपर पूर्ण लिहिलाय काय? असे अनेक प्रश्न विचारत बसण्यापेक्षा आता पुढील परीक्षा कोणत्या विषयाची आहे. त्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. परीक्षेला घरातून जाताना मुलांना आधार दिला पाहिजे. तसेच त्यांना धीर द्यावा म्हणजे मुले परीक्षेच्या काळात तणावमुक्त परीक्षा देऊ शकतात. तेव्हा मुले परीक्षेच्या काळात तणावमुक्त होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे.
रवींद्र तांबे







