Saturday, February 21, 2026

भारत-ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत

भारत-ऑस्ट्रेलियात आज निर्णायक लढत

कांगारूंच्या भूमीत तिरंगा फडकवण्याची महिला संघाला संधी

ॲडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामधील टी-२० मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत असून, शनिवारी होणारा तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा असेल. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर प्रथमच द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी भारतीय महिलांकडे आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवत जोरदार सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पलटवार करत १९ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरी साधली. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वोलने (८८ धावा) आणि बेथ मुनीने दिलेल्या १२८ धावांच्या सलामीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मागील सामन्यात भारताची मधली फळी गडगडल्याने विजयाची संधी हुकली होती. त्यामुळे उद्याच्या निर्णायक सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्याकडून आक्रमक सलामीची अपेक्षा आहे. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स यांना मोठी खेळी करावी लागेल. गोलंदाजीत रेणुका सिंग आणि अरुंधती रेड्डी यांच्यावर सुरुवातीचे धक्के देण्याची जबाबदारी असेल.

विक्रमी हरमनप्रीतवर सर्वांच्या नजरा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५६ सामने खेळण्याचा विश्वविक्रम नोंदवणाऱ्या हरमनप्रीत कौरसाठी हा सामना वैयक्तिकरीत्या खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी ती मालिका विजयासाठी जीवाचे रान करेल, यात शंका नाही.

सामन्याचा तपशील : सामना : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरी टी-२०)  भारतीय वेळ : दुपारी १. ४५.  स्थळ : ॲडलेड ओव्हल, ऑस्ट्रेलिया

Comments
Add Comment