मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट विश्वात घटस्फोटांची मालिका सुरु आहे. अशातच आता या मालिकेत अजून एका भारतीय क्रिकेटपटूची भर पडली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया वरून आपल्या घटस्फोटाची घोषणा केली आहे.
भारतीय फिरकी गोलंदाज राहुल चहरने शुक्रवारी (२० फेब्रुवारी) त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. राहुलने त्याची पत्नी इशानी जोहर सोबत ९ मार्च २०२२ रोजी गोव्यात लग्न केले. २० फेब्रुवारी रोजी, त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ही बातमी शेअर केली आणि सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांचे लग्न मोडल्याचे त्याने सांगितले.
राहुल म्हणतो की, खूप लवकर, म्हणजे खूप तरुण वयात लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मला स्वतःची पूर्ण समज नव्हती. मला नेमकं काय हवं आहे, माझी मूल्ये काय आहेत आणि मला कोणत्या प्रकारचे आयुष्य घडवायचे आहे, हे मला नीट समजले नव्हते. घटस्फोटाची ही प्रक्रिया सोपी नव्हती. राहुलने सांगितले की, गेले १५ महिने तो कोर्टाच्या चकरा मारत होता. त्याने या काळाचे वर्णन भावनिकदृष्ट्या थकवणारे असे केले आहे, परंतु याच काळात त्याला संयम आणि लवचिकता शिकायला मिळाली. तो पुढे म्हणतो, हा एक असा धडा (chapter) होता जो कायम टिकण्यासाठी नव्हता, तर तो काहीतरी शिकवण्यासाठी आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी होता. विशेष म्हणजे त्याने कोणावरही आरोप किंवा चिखलफेक केलेली नाही.
हार्दिक पांड्या, शिखर धवन, शेहवाग, आणि चहलचाही घटस्फोट :
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये टीम इंडियामधील क्रिकेटरांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ सुरुच आहे. हार्दिक पांड्या, माजी सलामीवीर शिखर धवन, शेहवाग तसेच फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल यांचाही घटस्फोट झाला आहे. हार्दिकने माहिरा शर्माशी नव्याने आयुष्य सुरु केलं आहे. चहलच्या घटस्फोटानंतर पुन्हा आरजेसोबत सूत जुळल्याची चर्चा होती, पण तिथंही वादळ आल्याची चर्चा आहे. शिखर धवनने दुसरी इनिंग सुरु करताना पुन्हा विदेशी गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे.