भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या गट टप्प्यात अपराजित राहून सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या उत्कृष्ट लयीत असून त्याला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. यादरम्यान भारतीय संघाचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने सांगितले की, भारतीय संघ सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी त्याची एकूण ताकद इतकी भक्कम आहे की साधारण दिवसातही त्याला पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही.
रविचंद्रन अश्विन याने एका यूट्यूब शोमध्ये सूर्या ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले. मात्र नेदरलँड्सविरुद्धचा फलंदाजीतील खेळ अपेक्षेइतका प्रभावी नसल्याचेही मान्य केले. अश्विन म्हणाला की सूर्यकुमार यादवने संयमाने डाव पुढे नेला, तर शिवम दुबे , हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग यांनी योग्य वेळी रन्स वाढवले तर भारतीय संघ सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी त्याची एकूण ताकद इतकी भक्कम आहे की साधारण दिवसातही त्याला पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपे नाही, असे अश्विनने नमूद केले.
अश्विन पुढे म्हणाला की; “सूर्याने उत्कृष्ट खेळी केली. रन्स करायची वेळ आली तेव्हा दुबे, हार्दिक आणि रिंकू तयार होते. त्यांना रनरेट कसा वाढवायचा हे चांगले ठाऊक आहे. मात्र नेदरलँड्सविरुद्ध भारतीय संघाची फलंदाजी दमदार नव्हती. वरुण चक्रवर्तीने उत्कृष्ट गोलंदाजी केली."
या दरम्यान अश्विनने तिलक वर्माच्या टी-२० क्रिकेटमधील विचारसरणीवरही भाष्य केलं. टी-२० मध्ये यश केवळ जोरदार फटके मारण्यावर अवलंबून नसते; योग्य टाइमिंग आणि बॅटच्या मध्यभागी चेंडू लागणे अधिक महत्त्वाचे असते, असे आर अश्विनने सांगितले. “तुम्ही वैभव सूर्यवंशीसारखे खेळू शकता, पण तिलकसारखेही खेळू शकता, जो उत्कृष्ट टाइमिंगसह गॅप शोधू शकतो."
रविवारी (२२ फेब्रुवारी) भारतीय संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महत्वाचा सामना खेळणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा सामना होईल. तर १ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध सुपर-८ फेरीतील अखेरचा सामना खेळला जाईल.