Friday, February 20, 2026

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी

मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी राजकीय नाट्य पाहायला मिळाले. भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळवले. या निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक फुटल्याचे स्पष्ट झाले असून, या बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

.

भिवंडीत महापौर निवडीच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झाली होती. भाजपने सुरुवातीला नारायण चौधरी यांच्या नावाचा विचार केला होता, मात्र प्रदेश पातळीवरील चर्चेनंतर आणि बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर स्नेहा पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. मात्र, चौधरी यांनी बंडखोरी करीत काँग्रेस आणि शरद पवार गटाचा पाठिंबा मिळवला. महापौर पदाच्या निवडणुकीत त्यांना ४८ मते मिळाली. तर, भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ १६ मतांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांनी २५ मते मिळवली.

या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "महापौरपदाच्या उमेदवारीबाबत पक्षात चर्चा सुरू होती. स्नेहा पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर नारायण चौधरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बंडखोरी केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांना दिला होता. त्यांनी बंडखोरी करणार नाही असे आश्वासन दिले होते, मात्र निकालातून त्यांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे," असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

पक्षांतर्गत कारवाईचा बडगा

महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी थेट वैचारिक प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने भाजप नेतृत्वाने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. "ज्यांनी-ज्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांविरुद्ध जाऊन आणि आदेश धाब्यावर बसवून काम केले आहे, त्या सर्वांवर पक्ष नियमानुसार कडक कारवाई करेल," असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >