Thursday, February 19, 2026

आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे;मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय - आनंद परांजपे

आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे;मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय - आनंद परांजपे

विलिनीकरणाचा कोणताही विषय आमच्यासमोर नाही;सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीकरण आणि दादांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हीच आमची प्राथमिकता...

मुंबई : आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते... पदाधिकारी... लोकप्रतिनिधी हे 'दादा' आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत. त्यात आम्ही एकमेकांना सावरतोय... एकमेकांना धीर देतोय... पण जे काही दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय ते अत्यंत चुकीचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे.

शरदचंद्र पवार गटाकडून वारंवार विलिनीकरणाची वक्तव्य येत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या 'माझा दादा गेला' त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या आता गौण आहेत असे बोलत आहेत तर दुसरीकडे आमदार रोहित पवार व खासदार अमोल कोल्हे हे पडद्याआडून सातत्याने विलिनीकरणाचा मुद्दा माध्यमांसमोर बोलून महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणारे वातावरण करत आहेत असाही थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला.

आमचं दैवत आदरणीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दूर्देवी मृत्यू झाला याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. विमान अपघातासाठी जबाबदार असलेली व्हीएसआर कंपनी असेल, पायलट किंवा ट्रॅक रेकॉर्ड असेल या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे हेही आवर्जून आनंद परांजपे यांनी सांगितले.

केंद्रीय उड्डाणमंत्री के रामा नायडू व मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच दिवशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो तर्फे चौकशी सुरू केली असून ब्लॅकबॉक्सचा डेटा रिकव्हर होणारच. सुप्रिया सुळे यांनी ब्लॅकबॉक्सचा डेटा जात नाही तो रिकव्हर होतो असे वक्तव्य पुण्यात केले आहे. मात्र रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ब्लॅकबॉक्स आगीत न जळता तो राजकीय आगीत गेला अशाप्रकारे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले याबद्दलही नाराजी आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.

खासदार अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेते आहेत. पण राजकारणातील तांत्रिक बाबी त्यांना कळत नसाव्यात. त्यांनी एबी फॉर्मचा मुद्दा उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती असेल किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत या दोन ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे काही उमेदवार हे आमचा एबी फॉर्म घेऊन लढले. एबी फॉर्ममध्ये दोन भाग असतात. 'ए' फॉर्ममध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी तीन लोकांना त्यामध्ये प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार शिवाजीराव गर्जे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार संजय खोडके यांच्याकडे अमरावती व नागपूर विभाग आणि माझ्याकडे कोकण आणि मराठवाडा विभाग याठिकाणी फॉर्म 'बी' वर सही करण्याची जबाबदारी दिली होती. आमच्या सहीचा बी फॉर्म उमेदवाराला दिला जातो. जेणेकरून त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घड्याळ दिले गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर उभे राहिलेले आहेत. खरंतर अमोल कोल्हे यांनी आम्हाला विचारण्याऐवजी त्यांनी स्वतः चे आमदार बापू पठारे यांना त्यांची दोन्ही मुले पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजप तिकीटावर लढले त्यांना विचारले पाहिजे. मुंबई, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार हे शिवसेना उबाठाची मशाल घेऊन लढलेले आहेत. मग उबाठा गटात शरद पवार गटाचे विलिनीकरण झाले आहे असे म्हणायचे का असा सवाल करत आनंद परांजपे यांनी अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेते आहेत मात्र त्यांना राजकारणातील तांत्रिक बाबी कळत नाहीत असा टोला लगावला.

विलिनीकरणाचा कोणताही विषय आमच्यासमोर नाही. सध्या आमच्यासमोर आमचं दैवत गेल्यानंतर आमची मायमाऊली राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार आहे आणि ताकदीने त्यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देणे आणि दादांचे जे व्हिजन होते त्या व्हिजनवर आमचे आमदार महायुतीमध्ये काम करतील ही प्राथमिकता आहे. त्यामुळे कायम पडद्यामागून एक एक वक्तव्य करून राज्यातील जनतेसमोर संभ्रम निर्माण करु नये असा मोलाचा सल्ला आनंद परांजपे यांनी शरद पवार गटाला दिला आहे.

Comments
Add Comment