मुंबई: राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी वाढली आहे. राज्यसभेवर आयारामाना संधी न देता पक्षातील निष्ठावंताना संधी मिळावी, यासाठी भाजपच्या काही निष्ठावंतांचे प्रयत्न सुरु आहेत. मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवले जाते. पण आता तरी निष्ठावंतांचा विचार व्हायला पाहिजे, असे भाजपच्या एका गटाचे मत आहे. तर भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा सुरु आहे. विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा असल्याची महिती समोर आली आहे.
राज्यसभेसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील.
महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य
शरद पवार (श.प. गट) रामदास आठवले (रिपाई) फौजिया खान (श.प. गट) रजनी पाटील (काँग्रेस) प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना) धैर्यशील पाटील (पेण- भाजप) भागवत कराड (भाजप)
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक
५ मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ मार्च – अर्जांची छाननी ९ मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख १६ मार्च – सकाळी ९ ते सायं. ४ मतदान; सायं. ५ नंतर मतमोजणी







