मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी कानमंत्र दिला आहे. "सुरुवातीच्या षटकांत आडवे फटके खेळण्याचा मोह टाळा आणि मैदानावर थोडा वेळ टिकण्याचा प्रयत्न करा," असा सल्ला गावस्कर यांनी अभिषेकला दिला आहे.
जगातील पहिल्या क्रमांकाचा टी-२० फलंदाज असलेल्या अभिषेक शर्मासाठी चालू विश्वचषक आतापर्यंत अत्यंत निराशाजनक राहिला आहे. पाकिस्तान, अमेरिका आणि नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात तो सलग तीन वेळा 'डक' (शून्य धावा) होऊन तंबूत परतला. त्याच्या या फॉर्ममुळे भारताच्या सलामीच्या जोडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच गावस्कर यांनी त्याला तांत्रिक सुधारणेचा मार्ग दाखवला आहे.
अभिषेकच्या फलंदाजीवर भाष्य करताना सुनील गावस्कर म्हणाले की, "अभिषेककडे फटक्यांची मोठी श्रेणी आहे, पण त्याला आपली नैसर्गिक आक्रमकता आणि संयम यांचा ताळमेळ बसवावा लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याची घाई करू नकोस. सुरुवातीला सरळ रेषेत खेळा आणि 'क्रॉस' फटके मारून स्वतःची विकेट बहाल करू नका." "मोठे षटकार मारण्याच्या नादात एकेरी धाव घेण्याकडे दुर्लक्ष करू नका. एकदा पाय मैदानात स्थिरावले की मोठी धावसंख्या उभारणे सोपे होईल," असे गावस्कर म्हणाले. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असण्याचे दडपण न घेता मूलभूत क्रिकेट खेळण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला.
सुपर-८ मध्ये पुनरागमनाची आशा
भारताचा पुढचा सामना २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. सुपर-८ च्या या महत्त्वाच्या सामन्यात अभिषेक शर्मा 'लिटिल मास्टर'चा हा सल्ला अंमलात आणून आपल्या फॉर्ममध्ये परतणार का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.