सातारा: शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर मोठा मशाल महोत्सव घेण्यात आला. यामुळे इतिहासाची साक्ष सांगणारा अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला.
गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी ३९६ वा शिव जयंती उत्सव संपूर्ण देशात साजरा होत आहे. अशातच छत्रपती शवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला साताऱ्यातील अजिंक्यतारा गडावर मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो मावळ्यांनी, शिव प्रेमींनी एकत्र येत शेकडो मशालींनी अजिंक्यतारा उजळवून टाकला.
या मशाल महोत्सवाला मंत्री शिवेंद्रराजे भोसले, साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते उपस्थित होते.
शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.अजिंक्यतारा किल्ल्याचे गड पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शेकडो मावळे आणि नागरीक हातात मशाली घेऊन अजिंक्यतारा किल्ल्याच्या बुरुजावर उभे होते यामुळे अजिंक्यतारा किल्ला उजळून निघाला.