मुंबई : "निधनाच्या आदल्या दिवशी मी अजितदादांना दिल्लीतून फोन केला होता, पण तो शेतकऱ्यांच्या कामासाठी होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांना अनेक लोक फोन करत असतात. मी त्यांना कुठल्याही कारणाने थांबवण्याचे काम केलेले नाही. मी दिल्लीत असताना ते नेमके कुठे आहेत, याची मला कल्पना नव्हती," असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी दिले.
माध्यमांशी संवाद साधताना पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. "दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे ही पक्षाची जबाबदारी आहे", असे त्यांनी नमूद केले.
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ...
'विलीनीकरणाची ही वेळ नाही'
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना पटेल म्हणाले की, "अजितदादांच्या निधनानंतर ही वेळ विलीनीकरणावर चर्चा करण्याची नाही. आज आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आमची संघटनात्मक पदे किंवा विधिमंडळ नेतृत्वाची रिक्त झालेली जागा भरण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत."
विमान कंपनीवर फोडले खापर
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना प्रफुल पटेल यांनी थेट विमान कंपनीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. "या दुर्दैवी घटनेत विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे. पायलटकडून काही दुर्लक्ष झाले असेल, तर ते सीबीआय चौकशीत समोर येईलच; मात्र सकृतदर्शनी विमान कंपनी या दुर्घटनेला मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मला वाटते," असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल तपासणी होणे आवश्यक असून, राज्य सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.
रोहित पवारांच्या आरोपांवर भाष्य टाळले
"पायलटने विमान मुद्दाम खाली पाडले," असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याबाबत उत्तर देताना पटेल म्हणाले, "मी एक जबाबदार व्यक्ती असून सरकारमधील प्रदीर्घ अनुभवामुळे मी जे काही बोलेन ते तथ्यांच्या आधारेच बोलेन. पुराव्याशिवाय कोणत्याही आरोपांना उत्तर देणे मला योग्य वाटत नाही."







