पुणे: शिवप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या किल्ले रायगडावरील रोप-वे सेवेबाबत प्रशासनाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रोप-वेची सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. रोप-वेच्या वार्षिक तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, पर्यटकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्याप्रमाणे करावे, असे आवाहन रोप-वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही नियमित प्रक्रिया राबवली जाते. या सहा दिवसांच्या कालावधीत रोप-वे यंत्रणेची सखोल तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्य केबल्स आणि ट्रॉलीची तपासणी, ब्रेक प्रणाली आणि सुरक्षा उपकरणांची चाचणी तसंच विद्युत यंत्रणा आणि तांत्रिक सुटे भाग यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. गडावर येणाऱ्या हजारो पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा, याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
१ मार्चपासून सेवा पूर्ववत
२८ फेब्रुवारी रोजी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, १ मार्च २०२६ पासून रोप-वे सेवा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी नियमितपणे सुरू केली जाईल. जे पर्यटक पायी चढून जाऊ शकत नाहीत, त्यांनी या तारखांची नोंद घेऊन आपले नियोजन करावे, जेणेकरून गडावर आल्यावर त्यांची गैरसोय होणार नाही.







