Wednesday, February 18, 2026

स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध?

स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध?

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण, स्थायी, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून या चारही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज भरले जाणार असल्याने भाजपा आणि शिवसेनेकडून उमेदवारी जाहिर होवून अध्यक्षपदाचे खरे चेहरे समोर येणार आहेत. दरम्यान, महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणुकीत उमेदवार न देता उबाठाने ही निवडणूक बिनविरोध केल्यानंतर या चारही समित्यांमध्ये उबाठाकडून उमेदवार देण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. त्यामुळे उबाठाने उमेदवार न दिल्यास ही निवडणूकही बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती, शिक्षण समिती, अध्यक्षपदासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे, तर सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या चारही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदे यांचे नाव जवळजवळ अंतिम झाले आहे. तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर यांची नावही निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. तर सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अमेय घोले आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी तृष्णा विश्वासराव यांचीही नावे अंतिम झाली आहेत. परंतु विरोधी पक्षांकडून या चारही समित्यांवर सदस्यांची नियुक्ती झाली असली तरी त्यातील कुणाला उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ज्या कारणांसाठी उबाठाने माघार घेत उमेदवार दिला नव्हता, तेच कारण आता चारही वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उबाठासमोर आहे. त्यामुळे चारही वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज न भरता ही निवडणूक बिनविरोध केली जाण्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बुधवारी उबाठाकडून प्रत्यक्षात उमेदवार दिला जातो की महापौर निवडणुकीप्रमाणे बिनविरोध केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे सर्व समित्यांमध्ये सत्ताधार पक्षांचे संख्याबळ हे विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या तुलनेत दोनने अधिक आहे.त्यामुळे निवडणूक काँटे की टक्कर नसल्याने उबाठाला प्रत्यक्षात मतदानाची भीती असून जर मनसे आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा न दिल्यास किंवा काँग्रेस तटस्थ राहिल्यास आपला गेम होईल याची भीती वाटत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा