देशात गेल्या दिवसांपासून आगीच्या घटना सातत्याने घडतांना दिसत आहेत. आज (मंगळवार १७ फेब्रुवारी) वर्धा - तुळजापूर रेल्वे मार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंधी जीटी एक्सप्रेस असलेल्या डब्याला अचानक भीषण आग लागली. रेल्वे प्रशासनाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा GT एक्सप्रेसच्या गार्डच्या डब्याला अचानक ही आग लागली. हा डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला. आग इतकी भयंकर होती की काही मिनिटांत संपूर्ण डबा आगीच्या भक्ष्यस्थानी आला. आगीची महिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. सुरुवातीला ही आग पार्सल कोचला लागली. त्यानंतर ही आग पसरुन गार्डच्या डब्याला लागली. ही ट्रेन तुळजापूरजवळ थांबवण्यात आली आहे. काही लोक या आगीत जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बोगीचं मोठं नुकसान झालं आहे.
राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी (१६ फेब्रुवारी) एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत किमान ८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.







