वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून केल्याची घटना सोमवारी (१६ फेब्रुवारी) मध्यरात्री घडली. ६० वर्षीय महिलेच्या खुनाची बातमी समोर येताच केवळ दोन तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. माणिकपूर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तपास पूर्ण करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं प्रकरण काय ?
बऱ्हाणपूर उमेळमान गावातील ‘भीमाई’ नावाच्या बंगल्यात दुर्गा संजय बनसोडे या एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा वालीव येथे राहत असून, सोमवारी दिवसभर संपर्क न झाल्याने आईची काळजी वाटली म्हणून आईला भेटण्यासाठी तो रात्री घरी आला आणि त्याला घरात हॉलमध्ये रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर तातडीने त्याने पोलिसांना कळवलं.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तेव्हा त्यांना डरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. बेडरूम मधील बेडवरची गादी बाजूला काढण्यात आली होती तसेच खोलीच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आल्याचे दिसून आले. यावरून गुन्हा पूर्वनियोजित असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला .
कौटुंबिक रागातून गुन्हा?
मृत महिलेने काही कारणावरून ओरडल्याचा राग मनात धरून आरोपीने आपल्या १६ वर्षीय मित्राच्या मदतीने हे टोकाचे उचलल्याचे पोलिसांनी संगितले. आरोपी मुलगा हा महिलेच्या भावाचा मुलगा असून त्या महिलेच्या घराच्या जवळच राहत होता.
कौटुंबिक वादातून घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे वसई परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांकडून घडलेल्या या गुन्ह्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.







