मुंबई: दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर भांडुप रेल्वे स्थानक परिसरात प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी महत्त्वाच्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत. अपघातानंतर स्थानकाबाहेरील वाढती गर्दी आणि तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेता रिक्षांना थेट स्टेशन प्रवेशद्वारापर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस ठराविक अंतरावर सीमारेषा आखण्यात आली असून ती ओलांडणाऱ्या रिक्षाचालकांकडून १ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. या निर्णयामुळे रिक्षांच्या अनियंत्रित गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळाल्याचे दिसून येत आहे.
अपघातापूर्वी स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे पादचारी आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत फेरीवाल्यांवर कारवाई केली आणि रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी रिक्षांची अनियंत्रित वर्दळ ही मुख्य समस्या कायम होती. नव्या बंदीनंतर मात्र वाहतूक कोंडीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, बेस्ट बसचे स्थानकाबाहेरील धोकादायक वळण हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. बस प्रवाशांच्या रांगेजवळील फुटपाथलगत वळण घेत असल्याचे चित्र आजही दिसून येते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवाशांनी रिक्षा बंदीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत रिक्षाचालकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.







