मुंबई: बुधवार २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात झालेल्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नि दिला. ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज २० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. अशातच विमान वाहतूक मंत्रालयाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी आता परदेशी तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचे विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे.
दोन्ही रेकॉर्डरचे आगीत नुकसान, परदेशी तज्ज्ञांची घेणार मदत:
अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडला होता. मात्र आगीत हा ब्लॅक बॉक्स जास्तच जळाल्याचे समोर आले. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदाच या अपघाताविषयी अधिकृत माहिती दिली आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते, ज्यात एक डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांचा समावेश आहे. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ उच्च तापमानात होती आणि आगीमुळे त्यांचे खूप नुकसान झाले असं त्यांनी माहिती दिली. त्यामुळे डेटा रिकव्हरी करण्यासाठी दुसऱ्या देशाची मदत घेतली जाणार असल्याचे विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे.







