नवी दिल्ली: देशातील बहुतांश भागांमध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) १८ फेब्रुवारीपर्यंत ७ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे.
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये हवामानात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, नवीन ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय होत असून त्याचा परिणाम पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि हिमवृष्टीच्या स्वरूपात दिसून येऊ शकतो. तसेच उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी प्रदेशांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञांच्या मते, या बदलामुळे काही भागांतील तापमानात चढ-उतार होऊ शकतो.
पुढील काही दिवस दिल्ली, एनसीआर, हरियाणा, उत्तरप्रदेश, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यांतील हवामानाचा अचूक अंदाज स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या अधिकृत माहितीनुसार वेळोवेळी जाहीर केला जाणार आहे.







