- मंत्री नितेश राणे यांनी दिले घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचे निर्देश
मुंबई : वर्सोवा-मढ परिसरातील प्रवाशांची सुरक्षा आणि जेट्टी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या भागात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेत, जेट्टी परिसर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी तातडीने घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वर्सोवा आणि मढ दरम्यान दररोज हजारो प्रवासी आणि मच्छिमार प्रवास करतात. मात्र, गेल्या काही काळापासून जेट्टी परिसरात अस्वच्छता आणि नागरी सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर राणे यांनी या परिसराचा दौरा केला.
मच्छिमार आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत राणे यांनी जेट्टीवर प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे सुचवले. विशेषतः जेट्टी परिसरात होणार कचरा आणि अस्वच्छता रोखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबवण्याचे निर्देश त्यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणी दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी, कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे, बंदर निरीक्षक जयश्री कांबळे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील खरमाळे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







