Monday, February 16, 2026

Suryakumar Yadav Ind vs Pak : सूर्याचा 'नादखुळा' अंदाज! पाकिस्तानला धूळ चारल्यावर ३ शब्दांत दिला विजयाचा मंत्र; काय लिहिलंय नेमकं?

Suryakumar Yadav Ind vs Pak : सूर्याचा 'नादखुळा' अंदाज! पाकिस्तानला धूळ चारल्यावर ३ शब्दांत दिला विजयाचा मंत्र; काय लिहिलंय नेमकं?

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी दारूण पराभव करत क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा आपला तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानला निष्प्रभ केले. या विजयामुळे भारताने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. दरम्यान, मैदानातील विजयानंतर सोशल मीडियावरही टीम इंडियाचाच बोलबाला पाहायला मिळाला. विशेषतः कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयानंतर केलेली खास पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून, त्यातून भारतीय संघाचा आत्मविश्वास आणि खेळाडूंची जिद्द स्पष्टपणे दिसून येत आहे. या विजयामुळे जगभरातील भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

फक्त ३ शब्दांच्या कॅप्शनने सोशल मीडियावर लावली आग

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सोशल मीडियावर आपल्या भावना अत्यंत खास पद्धतीने व्यक्त केल्या आहेत. सामना संपल्यानंतर सूर्याने इन्स्टाग्रामवर भारतीय संघाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले, मात्र फोटोंपेक्षाही त्याच्या कॅप्शनने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. सूर्याने केवळ ‘हर हर महादेव’ हे तीन शब्द लिहून आपला आनंद व्यक्त केला. या पोस्टनंतर अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाईक्सचा महापूर आला. 'मैदानात खेळाडूंनी आणि सोशल मीडियावर कर्णधाराने मनं जिंकली', अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहेत. टीम इंडियाची ही रणनीती आणि सूर्याचा हा 'अंदाज' सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारताने उभारला धावांचा डोंगर

टी-२० विश्वचषकाच्या मैदानात भारताने पाकिस्तानविरुद्ध आपल्या फलंदाजीचे रौद्ररूप दाखवत नवा इतिहास रचला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा पराक्रम केला. सलामीवीर ईशान किशनने ७७ धावांची स्फोटक खेळी करत भारतीय डावाचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मधल्या फळीत युवा खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला. तिलक वर्मा, शिवम दुबे आणि 'फिनिशर' रिंकू सिंह यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत भारताला १७५ धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताच्या या सांघिक कामगिरीपुढे पाकिस्तानी गोलंदाजी पूर्णपणे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय गोलंदाजांचा कहर

१७५ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सलामीपासूनच पाकिस्तानी फलंदाजांची तारांबळ उडाली. 'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीच्या काही षटकांतच पाकिस्तानच्या तीन मुख्य फलंदाजांना तंबूत धाडून विजयाचा पाया रचला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या ११४ धावांवर आटोपला. या विजयाने भारतीय गोलंदाजीचा दबदबा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सिद्ध झाला आहे.

कर्णधार सूर्याचं विधान

सामन्यानंतर बोलताना सूर्या म्हणाला की, "या खेळपट्टीवर १५५ धावांचे लक्ष्य देखील आव्हानात्मक ठरले असते, मात्र फलंदाजांनी १७५ धावा उभारून आम्हाला सामन्यात मोठी आघाडी मिळवून दिली." यावेळी त्याने सलामीवीर ईशान किशनचे विशेष कौतुक केले. सुरुवातीला काही महत्त्वाचे गडी बाद झाले असताना ईशानने ज्या संयमाने आणि जबाबदारीने फलंदाजी केली, तोच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरल्याचे सूर्याने नमूद केले. या दिमाखदार विजयामुळे भारताचे 'सुपर-८' फेरीतील स्थान आता जवळपास निश्चित झाले असून टीम इंडियाचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >