Monday, February 16, 2026

Rajasthan factory blaze : राजस्थान हादरलं! अलवारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्याला भीषण आग; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू

Rajasthan factory blaze : राजस्थान हादरलं! अलवारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्याला भीषण आग; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू

अलवार : राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत किमान ८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अजूनही दोन कामगार कारखान्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा कारखान्यात सुमारे २५ कामगार उपस्थित होते. आगीची बातमी समजताच शेजारील कारखान्यांमधील कामगारांनी सुरक्षिततेसाठी बाहेर धाव घेतली. कारखान्याच्या मालकाने ही जागा भाड्याने दिली होती, जिथे भाडेकरू बेकायदेशीररित्या फटाके तयार करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली दारूगोळा आणि कार्डबोर्डमुळे एका भीषण स्फोटानंतर आग झपाट्याने पसरली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून आसपासचे कारखाने रिकामे करण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीदरम्यान ३ ते ४ मोठे स्फोट झाले, ज्यामुळे नागरिक आणि कामगारांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासनतास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.

मृतांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांचा समावेश

राजस्थानच्या भिवाडी औद्योगिक क्षेत्रातील भीषण आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत सात मृतदेह हाती लागले आहेत. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (ADM) सुमित्रा मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गस्ती पथकाला या कारखान्यातून धूर निघताना दिसला, त्यानंतर तातडीने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. अर्धा डझनहून अधिक अग्निशमन बंबांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या आगीत मृत्युमुखी पडलेले कामगार उत्तर प्रदेश आणि बिहारचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असले, तरी अजूनही दोन कामगार बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. फायर स्टेशनचे प्रभारी राजू खान यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर G-१, ११८ मध्ये असलेला हा कारखाना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होता. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात कार्डबोर्डचा साठा करून ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कारखान्यातून धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच भिवाडी पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >