Saturday, February 14, 2026

Weather Alert: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

Weather Alert: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: राज्यातील हवामानात बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पोहोचताच हवामानात पुन्हा एकदा लक्षणीय बदल जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि हवामानाच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबदार आणि दमट हवामान असणार आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची जाणीव अधिक तीव्र होईल . कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या आसपास आहे, तर किमान तापमान २२ ते २४ अंशांदरम्यान आहे. किनारपट्टी भागात आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल.

आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात हवामान कोरडे राहील. येथे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांदरम्यान आहे, तर किमान तापमान १६ ते १९ अंशांदरम्यान नोंदवले जात आहे. सकाळी हलका गारवा असला तरी दुपारी वातावरण उबदार असेल.

गेले काही दिवस मराठवाडा आणि विदर्भ विभागात स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान आहे. आजही या भागातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी आदी भागात कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांदरम्यान पोहोचले आहे. किमान तापमान १८ ते २२ अंशांदरम्यान आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे.

एकंदरीत १५ फेब्रुवारी रोजी राज्यात तापमान वाढीचा कल कायम आहे. आकाश स्वच्छ, पावसाचा अभाव आणि थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. पुढील काही दिवसांतही राज्यात कोरडे आणि उबदार हवामान कायम राहील आणि हिवाळ्याचा प्रभाव आणखी कमी होत जाईल. यासोबत कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही हवामान विभागाने उष्णता वाढणार असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >