छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमला आहे. प्रशासनाकडून सुरक्षा आणि सुव्यवस्थेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे.
देशभरातून भक्त दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिर परिसरात सिंगल बॅरिकेट्सद्वारे नियोजन करण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त एसपी अन्नपूर्णा सिंग यांनी सुरक्षा व्यवस्था चोख असल्याची माहिती दिली. तसेच यावर्षी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
भारतीय अध्यात्मपरंपरेत भगवान शिव हे संहारक नव्हे तर पुनर्निर्मितीचे प्रतीक मानले जातात. शिवाची उपासना ही केवळ धार्मिक विधी नसून, ती मन, शरीर आणि चेतनेच्या शुद्धीकरणाशी संबंधित एक शास्त्रीय प्रक्रिया आहे.
शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि रात्रभर जागरण केल्याने मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतात. शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध अर्पण करण्यामागेही वैज्ञानिक आधार आहे. हे पदार्थ वातावरण शुद्ध करण्यास आणि मनःशांती देण्यास सहाय्यक मानले जातात. शिवाची उपासना म्हणजे अहंकाराचा त्याग, संयमाचे पालन आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याची साधना आहे. त्यामुळे शिवपूजा ही श्रद्धेसोबतच विज्ञानाशी जोडलेली आध्यात्मिक साधना मानली जाते.







