चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने विजेच्या खांबाच्या आधाराने गळफास घेतला. ही धक्कादायक घटना राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या भांदक येथे रेल्वेच्या हद्दीत घडली. रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळ १८ वर्षांच्या दुर्गेश प्रसाद मसरामने विजेच्या खांबाच्या आधाराने गळफास घेतला.
दुर्गेश मूळचा मध्य प्रदेशमधील कोको येथील रहिवासी होता. तो कुटुंबासह मोलमजुरीसाठी भांदक येथे आला होता. पण ऐन तारुण्यात दुर्गेशने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजलेले नाही. दुर्गेशच्या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती रेल्वे स्थानक परिसरात वर्धा-बल्लारशाह रेल्वे मार्ग आणि सायडिंगचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी आलेल्या मजुरांची वस्ती याच परिसरात आहे. दुर्गेश त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह याच भागात वास्तव्यास होता.
पहाटेच्या सुमारास दुर्गेश घरात नसल्याचे कुटुंबातील इतर सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध सुरू केली. ही शोधाशोध सुरू असताना रेल्वे पोलिसांना रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळील एका वीज खांबाला लटकून तरुणाने आत्महत्या केल्याचे समजले. घटनास्थळी पोलीस आणि दुर्गेशच्या कुटुंबातील सदस्य पोहोचले तेव्हा दुर्गेशने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी तपास सुरू आहे.







