Saturday, February 14, 2026

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही! केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही! केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही

मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आज प्रचंड, आत्मविश्वासानिशी वाटचाल करत असून यामध्ये भारत आपल्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत गोयल बोलत होते. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस श्वेता परुळकर, राजेश शिरवाडकर, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या पुढाकाराने जगातील ३८ राष्ट्रांसोबत भारताच्या मुक्त व्यापार करारांची वाटचाल सुरू झाली असून जगातील व्यापारक्षेत्राचा ७० टक्के भाग भारतासाठी खुला झाला आहे. भारतासाठी सर्वतोपरी लाभदायक ठरणाऱ्या या करारातून देशाचे संपूर्ण हित जपले जाईल, व शेतकरी वा अन्य कोणात्याही क्षेत्राच्या हितास बाधा येणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाच्या पूर्ततेमध्ये आता कोणतीही शक्ती बाधा आणू शकणार नाही, असा इशाराही गोयल यांनी दिला.

देशहिताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश विकासाच्या गतीने पुढे वाटचाल करत असून स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारताचे स्वप्न साकार होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून पंतप्रधानांच्या संदेशातून व्यक्त होणारी कर्तव्यभावना प्रतिबिंबित होत असल्याचा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.

जागतिक व्यापारक्षेत्रातील संधींचे दरवाजे भारतासाठी खुले होत असल्याने, अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतास या करारांचा अधिक लाभ होणार असून भारतातील शेतकरी, दूध, जीएम फूड यांना या करारातून वगळून शेतकऱ्यांचे हित जपले जात आहे. अन्य क्षेत्रांतील उत्पादनांस जगाच्या पाठीवरील नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची अभूतपूर्व संधी या करारांमधून मिळणार असून, यामुळे निर्यात, रोजगार आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या अमृतकाळात विकसित भारताची वाटचाल अधिक बलशाली करणारे महत्वाचे पाऊल या अर्थसंकल्पाद्वारे केंद्र सरकारने टाकले आहे, असे ते म्हणाले.

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा

आर्थिक प्रगती, आत्मनिर्भरता, मूलभूत सुविधांना वेग, यांमुळे अर्थव्यवस्थेस साडेतीन पट अधिक बळ प्राप्त झाले आहे. १४० कोटी देशवासीयांच्या आशाअपेक्षा पूर्ण करणे, देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच उत्पादनक्षेत्रास गती देणे, रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रास प्रोत्साहन व रोजागाराच्या नव्या संधी देणे, पतहमी योजनेस प्रोत्साहन, विदेशी गुंतवणूकीतून रोजगार वाढविणे, विदेशी चलननिर्मिती, नवीनीकृत ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन अशा बहुपेडी उद्देशातूंन देशाच्या प्रगतीची नवी वाटचाल पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे. व त्याचा थेट लाभ महाराष्ट्राला व मुंबईला मिळणार आहे. तीन नवे केमिकल पार्क, टेक्स्टाईल पार्क, विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे प्रकल्प, 'सबका साथ सबका विकास ' या ध्येयानुसार देशातील प्रत्येक नागरिकाचा विकास या कर्तव्यभावनेतून अर्थसंकल्पाची मांडणी केली आहे. महाराष्ट्रात या नीतीचा मोठा फायदा होणार आहे.

रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात येत असून महाराष्ट्राकरिता २४ हजार कोटींची तरतूद करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेस प्रोत्साहन देणाऱ्या योजना, पुणे, नागपूरमध्ये ग्रोथ हबच्या रूपाने येत्या पाच वर्षांत विकास साधला जाणार असून त्यासाठी प्रत्येक शहराकरिता पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई-पुणे व पुणे हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरची योजना आखली जात आहे. अर्थसंकल्पाच्या प्रत्येक पैलूमध्ये महाराष्ट्राचा लाभ आणि महाराष्ट्राचे योगदान प्रतिबिंबित होत आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे होईल, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे होईल, वाढवण बंदर विकसित होईल, तिसरे विमानतळ कार्यान्वित होईल, पर्यटनास प्रोत्साहन दिले जाईल, तेव्हा स्वाभाविकच महाराष्ट्राला त्याचा लाभ होणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राकरिता या अर्थसंकल्पातून व मोदी सरकारच्या सर्व योजनांतून मोठा फायदा होणार असून पंतप्रधानांच्या रिफॉर्म एक्स्प्रेसद्वारे देशात एक परिवर्तनाची लाट येत आहे. फ्री-ट्रेड ॲग्रीमेंट 38 विकसित देशांसोबत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे, असे सांगून गोयल यांनी महाराष्ट्र व मुंबईच्या विकासाचा मोदी सरकारच्या संकल्पाचा तपशीलवार आराखडाही या पत्रकार परिषदेत सादर केला.

काँग्रेसमध्ये नैराश्य दाटले आहे. जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याखेरीज त्यांच्याकडे कोणतीही ठोस योजना नाही, कोणतेही प्रस्ताव नाहीत, आणि अपप्रचार फैलावून केंद्र सरकारवर टीका करण्याखेरीज कोणताही मुद्दादेखील काँग्रेसकडे नाही. त्यामुळेच एकामागून एक खोटे पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. मात्र, राहुल गांधी यांच्यासारखा नेता व त्यांच्या आघाडीस ज्या प्रकारे जनतेने नाकारले आहे, ते पाहता त्यांचे हे नैराश्यग्रस्त प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >