मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात गिरगावकरांचा बांध अखेर फुटला. गिरगाव पूल बचाव समिती आणि मंगळवाडी - केळेवाडी रहिवासी संघटना यांच्या विद्यमाने शनिवारी सैफी सेल्फी हॉस्पिटलच्या गेट समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. गिरगावकरांच्या हक्कासाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा ही या आंदोलनात सहभागी झाले. गिरगावकरांच्या हक्कासाठी आंदोलनात सहभाग घेतला असून सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही पुल होणारच, असा निर्धार यावेळी मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.
सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात मोठ्या संख्येने गिरगावकर रस्त्यावर उतरले होते. सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाने गेली चार वर्ष पुलाचे काम रखडवले आहे. चर्नी रोड आणि गिरगावला जोडणाऱ्या पुला अभावी गिरगावकर अतोनात हाल सहन करत आहेत.या ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात दोन जणांचा हकनाक बळी गेल्याची माहितीही यावेळी गिरगाव पुल बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दीड वर्षापूर्वी न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाचे काम सुरू झाले. मात्र पुन्हा सैफी हॉस्पिटलने मनमानी करून बांधकाम थांबवले आहे. आता मुंबई महापालिकेचा कारभार नव्याने सुरू झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष्य पुन्हा या मुद्यावर केंद्रित होण्यासाठी गिरगावकर रस्त्यावर उतरले असल्याचेही या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रकरण काय?
गिरगाव मधील चर्नी रोड ते केळेवाडी पर्यंत पुल व्हावा, यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेली तीन वर्ष सातत्याने लढा दिला आहे. प्रशासकीय पातळीवर मुंबई महापालिका तसेच पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल प्रशासनाशीही त्यांनी बैठका घेतल्या आहेत. मुंबई महापालिकेकडे या पुलाचा पाठपुरावा करून मंत्री लोढा यांनी पालिकेकडून मान्यता मिळवली. त्यासाठी निधीची तरतूद देखील झाली. मात्र सैफी हॉस्पिटलने या पुलाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गिरगावकरांच्या प्रश्नाची दखल घेऊन मुंबई महपालिकेला पूल बांधण्यास परवानगी दिली. पालिकेने पुलाचे कामही सुरू केले. पुलाचे ६० टक्के काम पूर्ण होत असतानाच, पुन्हा सैफी हॉस्पिटल प्रशासनाने यात अडवणूक केली आहे.







