Friday, February 13, 2026

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या दरम्यान सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामाला वेग आला असून मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर दिली.

सध्या या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना तासन्‌तास अडकून राहावे लागत आहे. रस्त्याच्या विस्तारीकरणानंतर वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांना कडक सूचना

बैठकीदरम्यान शिंदे यांनी विकासकामांचा आढावा घेतला. मंजूर निधीचा योग्य वापर न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठाणे परिसरातही प्रकल्पांना गती

ठाण्यातील साकेत उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तसेच कळवा–खारीगाव खाडी पुलाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून तोही लवकरच नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे आदेश

पावसाळ्याआधी सर्व महापालिका आणि नगरपालिकांनी रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल पूर्ण करावी, जेणेकरून खड्डे आणि अपघात टाळता येतील, असे निर्देशही देण्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून आले. ग्रामीण भागातील शैक्षणिक व आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी सुमारे १७०० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा