Friday, February 13, 2026

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून एक मोठा आणि खळबळजनक दावा करण्यात आला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखात म्हटले आहे की, "विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता." या दाव्यामुळे राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. जरी स्वतः शरद पवार यांनी सार्वजनिकपणे विलिनीकरणाच्या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवले असले, तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत.

‘दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले’

साप्ताहिकातील लेखात शशिकांत शिंदे यांनी नमूद केले आहे की, विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचे सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, दादांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर खुद्द शरद पवार यांनीच १२ फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय होणार होता, असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले. याच मुद्द्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीतील दुसऱ्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल–सुनील तटकरे गटाकडून रोहित पवारांना खुले आव्हान देण्यात आले. त्यावर रोहित पवारांनी, "दादांच्या निधनामुळे आम्ही सध्या संयम बाळगत आहोत", असे म्हणत आक्रमक भूमिका टाळल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, आता शशिकांत शिंदे यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता शशिकांत शिंदे यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >