Friday, February 13, 2026

Sunil Tatkare: विलीनीकरणाबाबत प्रस्ताव आल्यास भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य - सुनील तटकरे

Sunil Tatkare: विलीनीकरणाबाबत प्रस्ताव आल्यास भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य - सुनील तटकरे

शशिकांत शिंदे यांच्या लेखाचा घेतला समाचार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेमुळे राज्यातील राजकारण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट करत, कोणताही विलीनीकरणाचा प्रस्ताव समोर आल्यास भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले. तसेच, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या दाव्याचाही त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला.

विलीनीकरणाच्या शक्यतेवर पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले की, “विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा विचार समोर आला, तर त्यावर पक्षपातळीवर चर्चा होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर विचार करतील. मात्र, आम्ही एनडीएचा घटक पक्ष आहोत आणि एनडीएचा मुख्य पक्ष भाजप आहे. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना भाजपला विश्वासात घेणे आवश्यक आहे.” २०२३ मध्ये एनडीएमध्ये सहभागी होताना भाजपची अनुमती घेतल्याची आठवण करून देत, भविष्यातही आघाडीतील मुख्य पक्षाशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात लिहिलेल्या लेखात, अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या आणि खोट्या षडयंत्रांमुळे अजित पवारांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागल्याचा दावा केला होता. तसेच, झालेली चूक दुरुस्त करण्याच्या उद्देशाने ते मागील काही महिन्यांपासून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त करत तटकरे म्हणाले की, “शिंदेंनी केलेले विधान अत्यंत गैर आहे. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर अशा प्रकारचे लिखाण करणे अनाठायी आहे. दादांनी घेतलेले निर्णय स्वच्छ मनाने आणि पक्षाच्या हितासाठीच होते. आता असे लिहून ते नेमके काय साध्य करू इच्छितात, त्यांचा हेतू काय आहे, हे समजत नाही.”

अजित पवार यांची भाजपबाबतची भूमिका पूर्वीपासूनच स्पष्ट होती, असा पुनरुच्चार करत तटकरे यांनी सांगितले की, २०१४, २०१६ आणि २०१७ मध्येही भाजपसोबत चर्चेचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले होते. २०१९ मध्येही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्याला स्थिरता देऊ शकते, असे मत अजित पवारांनी स्पष्टपणे मांडले होते. त्यांनी ही भूमिका कधीही लपवून ठेवली नव्हती, असेही तटकरे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment