Friday, February 13, 2026

Narhari Zirwal: "चौकशीत नाव आलं तर..."; ACB च्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

Narhari Zirwal:

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "या प्रकारच्या चौकशीत माझं नाव आलं तर मी राजीनामा देईन", अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले नरहरी झिरवाळ ?

नरहरी झिरवाळ यावेळी दिल्लीत असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जर या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध आढळला तर राजीनामा देणार असं जाहीर केलं आहे. तसंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचे दावे फेटाळून लावले. आपण मुंबईत गेल्यावर बैठक घेणार असून, इतर कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"मी तर परवापासून येथे आहे. हा प्रकार चुकी़चा असून, असं व्हायला नको होतं. ढेरंगे हे आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात. सुनावणीते पेपर बनवण्याचं काम ते करतात. तसे ते मूळचे अन्न, नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसणवारीवर घेतललं होतं. आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही. त्याला जाब द्यावा लागणार आहे," असं नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी िझरवाळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवाळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतले. तपास झाल्यानंतर मग या संबंधित लिपिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा