अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याच पार्श्वभूमीवर आता १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान शहरातील वाहतुकीत काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
हे मार्ग राहतील बंद:
मिळालेल्या माहितीनुसार, काही मुख्य मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू असेल. वैभव हॉटेलकडून शहरात थेट प्रवेश बंद राहील. संबंधित वाहनांना हिंदू स्मशानभूमी, वडवली सेक्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे वळवण्यात येईल. स्वामी समर्थ चौकातून गोविंद तीर्थ पुलाकडे जाणाऱ्या वाहनांनाही ‘नो एन्ट्री’ असेल. अवजड वाहनांची सोय:
अवजड वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. एमआयडीसी आणि अन्य जड वाहनांसाठी आनंदनगर टी-जंक्शन, फॉरेस्ट नाका आणि लादीनाका हे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
पार्किंगची सुविधा:
लहान वाहनांसाठी हिंदू स्मशानभूमी ते गोविंद तीर्थ पुलादरम्यान पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बस व मोठ्या वाहनांसाठी लोकनगरी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाविकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







