Thursday, February 12, 2026

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या कामगार कायद्यांविरोधात आणि काही आर्थिक धोरणांच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.

संपामध्ये देशातील १० प्रमुख केंद्रीय ट्रेड युनियनचा सहभाग असून INTUC, AITUC, HMS, CITU यांसह इतर संघटनांनी कामगारांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नव्या लेबर कोडमुळे नोकरीची सुरक्षितता कमी होईल, कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे स्वातंत्र्य वाढेल आणि किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षेवर परिणाम होईल, असा आरोप संघटनांनी केला आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी २९ कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यांसारख्या शेतकरी संघटनांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह प्रमुख बँक संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी २ वाजता देशभरात संघटनांकडून आंदोलन केलं जाणार आहे.

संपामागील कारणं आणि मागण्या काय?

- केंद्र सरकारने गेल्यावर्षी २९ कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरुद्ध कामगार संघटनांनी हा एल्गार पुकारला आहे.

- नवीन संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होणार असून नोकरीची सुरक्षितता धोक्यात येणार आहे.

- याव्यतिरिक्त, खासगीकरण, वेतनातील तफावत, वीज दुरुस्ती विधेयक, बियाणे विधेयकाचा मसुदा आणि 'पीस' कायदा रद्द करावा.

- मनरेगा योजना पुनर्संचयित करण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे.

'या' सेवांवर होणार मोठा परिणाम:

१) बँकिंग सेवाः प्रमुख बँक संघटना संपात सामील झाल्यामुळे बँक व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, बँका अधिकृतपणे बंद नसून ऑनलाईन व्यवहार आणि एटीएम सेवा सुरू राहतील.

२) वाहतूक सेवाः बस, रिक्षा आणि ट्रक चालक संघटनांच्या सहभागामुळे प्रमुख शहरांमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

3) बाजारपेठ आणि व्यापारः घाऊक आणि किरकोळ बाजारपेठांमधील व्यापारी संघटनांनी संपाला नैतिक पाठिंबा दिल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद राहू शकतात.

४) शिक्षण संस्थाः वाहतुकीच्या समस्या आणि सुरक्षिततेचे कारण लक्षात घेता, काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

काय सुरू राहणार?

- रुग्णवाहिका आणि रुग्णालये

- अग्निशमन दल

- विमान सेवा

- दूध आणि भाजीपाला पुरवठा

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >