मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत केलेल्या उद्बोधनावर राज ठाकरे यांनी टीका केली. त्यानंतर भाजपसह संघ वर्तुळातून राज यांच्या विधानाचा कठोर शब्दांत समाचार घेतला जात आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील राज यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत, "सरसंघचालकांच्या उद्बोधनाला आलेले मान्यवर नव्हे, तर राज ठाकरेच नरेंद्र मोदींना जास्त घाबरत आहेत, " असा टोला लगावला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, कार्यपद्धती आणि समाजातील योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. त्यामुळे या कार्यक्रमाची देशभरात चर्चा झाली. या कार्यक्रमानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून टीका केली. कार्यक्रमाला आलेली मंडळी संघप्रेमापोटी नव्हती, तर सरकारच्या दबावामुळे किंवा भीतीमुळे आली होती, असा आरोप त्यांनी केला. यापूर्वी अशा कार्यक्रमांना कोणी का उपस्थित राहिले नव्हते, असा सवाल उपस्थित करत ही उपस्थिती संघासाठी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भीतीपोटी असल्याचे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर भगतसिंह कोश्यारी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. संघाच्या कार्यक्रमाला लोक मोदींना घाबरून आले नव्हते. उलट राज ठाकरेच नरेंद्र मोदींना जास्त घाबरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांनी मोदींना घाबरू नये, तर त्यांच्या जवळ जावे, असा सल्लाही त्यांनी दिला. मोदींसाठी सर्व जनता समान आहे, असे सांगताना कोश्यारी यांनी प्रभू राम आणि त्यांच्या प्रजेचा दाखला दिला. ज्या पद्धतीने रामाला सर्व प्रजा समान होती, त्याचप्रमाणे मोदींसाठीही सर्व नागरिक समान आहेत, असे ते म्हणाले. राज ठाकरे माझे ‘लहान भाऊ’ आहेत. ते वाणीने कडक असले तरी चांगले नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत राहणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत, चुकीचे काम करण्यास घाबरावे; मात्र व्यक्तींना घाबरू नये, असा सल्लाही भगतसिंह कोश्यारी यांनी दिला.







