नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली आणि त्यानंतर त्या तडक दिल्लीला रवाना झाल्या. आज त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक मानला जात आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार देखील सध्या दिल्लीतच तळ ठोकून आहेत. अजित पवार यांच्या अपघाताबाबत काल मुंबईत बोलताना रोहित पवारांनी "हा अपघात नसून १०० टक्के घातपाती प्रयत्न आहे," असा खळबळजनक आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजता रोहित पवार दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत. कालच्या गंभीर आरोपानंतर आज ते दिल्लीतून नेमका कोणता नवा गौप्यस्फोट करतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. एका बाजूला सत्तेतील वाटा आणि दुसऱ्या बाजूला आरोपांच्या फैरी, यामुळे दिल्लीतील या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.
सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना ...
मोदी-शाहांच्या भेटीत 'विलीनीकरणा'वर चर्चा होणार?
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आजचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून, आज त्या महत्वपूर्ण भेटीगाठी घेणार आहेत. थोड्याच वेळात त्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाणार असून, त्यानंतर सकाळी ११ वाजता संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतील. यानंतर त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार असून, या दोन्ही भेटींमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या दौऱ्यातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार आज आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सुपूर्द करू शकतात. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या खासदारकी सोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याशिवाय त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. आज रात्रीच त्या पुन्हा मुंबईला रवाना होणार असल्या तरी, दिवसभरातील या हाय-प्रोफाइल भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
अजित पवारांच्या अपघातावरून नव्या गौप्यस्फोटाची शक्यता
महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाची ठिणगी आता देशाच्या राजधानीत पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार आज दिल्लीत एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असून, त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर गंभीर संशय व्यक्त करत प्रश्नांची सरबत्ती केली होती. "हा निव्वळ अपघात नसून घातपात आहे," असा खळबळजनक दावा केल्यानंतर, आज दिल्लीतून ते या प्रकरणाचा पुढील भाग उघड करण्याची शक्यता आहे.







